
कोपरगाव प्रतिनिधी:- गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव शहरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला आहे. कोपरगाव शहरात विविध ठिकाणी रस्त्यावर, चौकात मोकाट जनावरांचा कळप ठाण मांडून बसलेला असतो. या चौकाचौकात ठाण मांडून बसलेल्या मोकाट जनावरांमधून आपला जीव वाचवत मार्ग काढावा लागतो. यामुळे अनेकदा अपघात झालेले आहेत. तसेच जनावरांच्या हल्ल्यात नागरिक जखमीही झालेले आहेत. अनेक नागरिकांनी सातत्याने मागणी करूनही पालिकेने याबाबत कधीच गांभीर्याने घेतले नाही. भल्या पहाटे पासून मॉर्नींग वॉकला जाणाऱ्या नागरिकां पासून दिवसभरात पादचाऱ्यांना, दुचाकी स्वार, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनी, वयोवृद्ध नागरिक अनेकांवर या मोकाट जनावरांनी हल्ले केले आहेत. अनेक तक्रारी करुनही नगरपालिकेकडून कोणतेही पाऊल उचलले जात नाही. पालीकेकडून काही तरी करण्याचे नाटक मात्र केले जाते. भविष्यात काही गंभीर घटना घडल्यास त्यास पालिका प्रशासन जबाबदार राहील. नगरपालिकेच्या गलथान कारभाराच्या विरोधात लवकरच मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा महिलांनी दिला आहे.
शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमलताई पुंडे यांच्या नेतृत्वाखाली कमल नरोडे, पुष्पाताई जगताप, शारदा सुरळे, कल्पना मोरे , रीना मांढरे , रेखा खडांगळे, सुनंदा राठी , रंजना भोईर , रूपाली महाडिक , कानडे , कविता शहा , धनश्री देवरे, छाया खेमनर, ज्योत्स्ना धामणे , स्वाती अमृतकर, वंदना चिकटे , सविता साळुंखे, सुवर्णा दर्पेल, संध्या भालेराव, सुप्रिया गरजे आदी अनेक महिलांनी सहभाग घेतला.
