
कोपरगाव प्रतिनिधी :-
“जय महाराष्ट्र” आपण भेटल्यावर स्वप्निल तू मोठा आवाज देवून नेहमी म्हणायचा,.पण आठवत नाही शेवटचा आपला जय महाराष्ट्र कधी झाला तो,. पण तुझ्या अशा निसर्गाच्या विरोधात जाऊन या पध्दतीने अखेरचा निरोप घेणे हे सर्वांच्या काळजाला चटका लावून गेले मित्रा स्वप्निल,. कमी वयात कोपरगाव सारख्या गुंतागुंतीच्या राजकीय परिस्थितीतही खरंतर परमेश्वराने एका शिक्षीत कष्टाळू कुटुंबातील तुला कोपरगाव नगरीचा उपनगराध्यक्ष करून मोठा न्याय दिला होता,जो पिढ्यान् पिढ्या काहींच्या नशीबी नसतो,. त्यामुळे तरूण पिढीला राजकारणा विषयी आदर भावना निर्माण झाली होती, युवा पिढीला राजकारणात येण्याची इच्छाशक्ती निर्माण झाली होती कदाचित यामुळे राजकारणात तरूण पिढी येवून निस्वार्थी राजकारण होवून कोपरगाव शहराचा विकास करण्यासाठी एक सक्षम फळी उभी राहिली असती हे नक्की,.पण मित्रा स्वप्निल तुझ्या या अचानक निर्णयामुळे युवा पिढीने कसा आदर्श घ्यावा हेच कळत नाही ए,.?
मित्रा स्वप्निल या जगात कोणीही १००% सुखी नाही रे भाऊ,.तु आता स्वर्गात गेल्यावर तुझ्या आधी तेथे पोहचलेल्या आत्म्यांना जरा विचार, एकदाच मिळालेले आयुष्य हे किती अनमोल होते ते, आणि काय काय जगायचे राहून गेले ते खरंच विचार एकदा तू,. असो,. मित्रा स्वप्निल तुझे दुःख यातना त्रास तुलाच माहीत असेल,तु कधी मित्रांमध्ये तो शेअर केलाच नाही,केला असता तर आज ही तुझ्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दुःखद वाईट प्रसंगाची वेळ आलीच नसती,.दोन देह तिथे दोन वेगवेगळे विचार आलेच, भांड्याला भांडं लागणारच, वादविवाद होणारच,. आणि मित्रा स्वप्निल तू राजकारणी माणूस इतक्या हळव्या मनाचा असशील हे कधी वाटलेच नव्हते,कारण राजकारणात सक्रिय असलेले लोक हे निगरगट्ट मनाचे असतात असे लोकच कायमच म्हणतात,.मंग तू मित्रा स्वप्निल, का इतक्या लवकर तुझ्या वास्तव्यासाठी कायमस्वरूपी तुझ्या पत्त्यावर पोहचला,.? प्रत्येकाच्या जीवनात कुरबुरी,कर्ज, संघर्ष असतोच यार,तसाच तो तुझ्या आयुष्यातही कदाचित असावा,.तू नेहमी इतरांना मार्गदर्शन करायचा, तुझ्या हसतमुख चेहऱ्याने जगण्याची उमेद अनेकांना निर्माण करून द्यायचा,हे आम्ही मित्रांनी अनेकदा अनुभवले आहे,. भेटेल तेंव्हा मिश्कीलपणे हसत मित्रांची मस्करी करायचा,तुझी देहबोली ही निःस्वार्थी आणि संघर्षाची कहाणी सांगणारी काटक निरोगी शरीराची होती,. इतकं देखणं रुप देवानं तुला देवून सुध्दा तू आमच्या मित्र प्रेमाशी का प्रतारणा केली.?
तू आता अनंतात विलीन झाल्यानंतर तुझ्या आठवणी फक्त ह्रदयाच्या कप्प्यात साठवून ठेवून सतत युवा पिढीला माझं सांगणं असेल काही क्षणांचा राग हा इतक्या टोकाची भुमिका घेण्यास भाग पाडू नका कारण जन्मदात्याच्या वेदना या मृत देहाला कळत नाही, आणि या वेदना जाणून घेण्यासाठी पुन्हा वन्स मोअर मिळत नाही मित्रा स्वप्निल.
निघण्याची वेळ झाली,…
अखेरचा निरोप घ्यावा
निघण्याची वेळ झाली
पुन्हा भेट होते की नाही
वेळ स्वप्निल तुला सांगून गेली,.?
ओम शांती.
शब्द मनातले,.
भ.मो.
९५५२२२५५२८
