
कोपरगाव प्रतिनिधी
कोळपेवाडी वार्ताहर :- औद्योगिक क्षेत्रात अजोड योगदान देणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी आपल्या जीवनात उद्योगक्षेत्र आणि समाजसेवा यांचा समतोल साधतांना समाजापुढे आदर्श उभा केला होता.उद्योग व्यवसायाबरोबरच देशाच्या आर्थिक विकासात व समाजाच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान कधीही विसरण्यासारखे नसून त्यांच्या रूपाने सपूर्ण विश्वाने सामाजिक बांधिलकी जपणारे अनमोल रत्न गमावले आहे अशा शब्दात आ.आशुतोष काळे यांनी टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
औद्योगिक क्षेत्रात मोठं योगदान देणारे व देसशेवेसाठी देखील आपले आयुष्य रतन टाटा यांनी वाहून घेतलं होत. संपूर्ण जीवनात उद्योगक्षेत्र आणि समाजसेवा करतांना त्यांच्या दूरदृष्टीमुळे टाटा समूहाने केवळ देशातच नव्हे तर जागतिक स्तरावरही मानाचे स्थान मिळवले आहे. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक किंवा मानवी संकटात मदतीचा हात देण्यासाठी ते नेहमी पुढे होते. आपला साधेपणा जपून एका यशस्वी उद्योजकाबरोबरच सातत्याने समाजाचा विचार करून माणुसकीचे दर्शन घडविणारा त्यांचा जीवन प्रवास नेहमीच प्रेरणा देत राहणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
