माझ्या बळीराजावर व माझ्या जनतेवर कृपादृष्टी ठेवण्याचे रामलल्लाला मागणे मागावे आयोध्येला जाणाऱ्या संत-महंतांच्या चरणी आ. आशुतोष काळेंची प्रार्थना, श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमली कोपरगाव नगरी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- तमाम प्रभू श्रीराम भक्तांचे मागील पाचशे वर्षापासूनचे स्वप्न येत्या २२ जानेवारी रोजी साकार होत आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिरात होणाऱ्या या अभूतपूर्व व ऐतिहासिक रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे परमभाग्य आपणास मिळाले आहे. आपण माझ्या बळीराजावर व माझ्या मतदार संघातील जनतेवर कृपा दृष्टी ठेवण्याचे मागणे मागावे अशी प्रार्थना आ. आशुतोष काळे यांनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जाणाऱ्या संत-महंतांच्या चरणी केली.
२२ जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील अनेक साधू-संत-महंतांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच कोपरगाव मतदार संघातील साधू संतांच्या वतीने संत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमाचे मठाधिपती प.पु. सदगुरु रमेशगिरीजी महाराज, श्री क्षेत्र सराला बेट (गोदाधाम) चे उत्तराधिकारी प.पु. सदगुरु रामगिरीजी महाराज व आत्मा मलिक ध्यानपीठचे प.पु. सदगुरु परमानंदजी महाराज यांना देखील निमंत्रित करण्यात आले आहेत. या महंतांचा तसेच कोपरगाव मतदार संघातील विविध देवस्थानचे संत-महंत, तसेच वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, मृदुंगाचार्य, गायनाचार्य व भजनी मंडळांचा पाद्य पूजनाचा कार्यक्रम व प्रभू श्रीरामांच्या महाआरतीचा कार्यक्रम आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक याठिकाणी मतदार संघातील हजारो श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी आ.आशुतोष काळे यांनी संत-महंतांच्या चरणी प्रार्थना केली.तत्पूर्वी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून साधू संतांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील अनेक साधू-संत-महंतांबरोबरच आपले गुरुवर्य प.पु.रमेशगिरिजी महाराज व प.पु. रामगिरीजी महाराज, प.पु.परमानंदजी महाराज यांना मतदार संघातील साधू-संत व महंतांच्या वतीने विशेष निमंत्रित करण्यात आले हि आपणा सर्वांसाठी भाग्याची व अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे त्यांचे पूजन करणे हे आपले धार्मिक कर्तव्य आहे. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची पाचशे वर्षापासूनची प्रतीक्षा २२ जानेवारीला पूर्ण होत आहे.पवित्र अयोध्येच्या भूमीत प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारले जावून श्रीराम मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होत आहे हा प्रत्येक श्रीराम भक्तांसाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे. अनेक शतकातून एकदा अशा गोष्टी घडतात.आपण रामयुग पाहिलेले नाही, धार्मिक ग्रंथात ऐकलेले आहे. आपण रामयुगात नव्हतो पण राम मंदिर बांधण्याच्या युगात आहोत याचा आपणा सर्वासह मला देखील अभिमान वाटतो. त्यामुळे हा अभूतपूर्व क्षण व हा दिवस मतदार संघातील श्रीराम भक्तांनी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून दारात दिप लावून दिवाळीसारखा साजरा करावा असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी यावेळी केले.
यावेळी उपस्थित साधू-संत व महंतांच्या वतीने प.पु. सदगुरु रामगिरीजी महाराज म्हणाले की, आपण खूप भाग्यवान आहोत आपल्याला प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या क्षणाचे साक्षीदार होता आले. पितृ वचनाचे पालन करण्यासाठी हसतमुखाने राज्याचा त्याग करून चौदा वर्ष वनवासाला जाणाऱ्या प्रभू श्रीरामाचा आदर्श घ्यावा.जरी आपण अयोध्येला प्रभू श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जावू शकत नसलो तरी आपल्या गावातील मंदिरात हा सोहळा साजरा करावा. प्रभू श्रीरामाचे भजन करावे. प्रभू श्रीराम ज्यावेळी रावणाचा वध करून अयोध्येत परत आले त्यावेळी अयोध्येत गुढ्या उभारून आनंदोत्सव साजरा करण्यात आला त्याप्रमाणे हा उत्सव साजरा करून घरोघरी श्रीराम दीप लावून दीपोत्सव साजरा करावा असे आवाहन केले.

चौकट :- संतांचा सन्मान व पूजन करणे स्तुत्य उपक्रम असून धार्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या आ.आशुतोष काळे यांनी कोकमठाण येथे पार पडलेल्या संत सदगुरु गंगागिरी महाराजांच्या ऐतिहासिक १७५ व्या अखंड हरीनाम सप्ताहासाठी १७५ पोती साखर व ५१ लाख रुपये मदत केलेली आहे. व भविष्यात देखील श्री क्षेत्र सराला बेट (गोदाधाम) ची सेवा करण्याची त्यांची इच्छा होती.त्यामुळे त्यांनी श्री क्षेत्र सराला बेट (गोदाधाम)च्या गो-शाळेची जबाबदारी त्यांनी घेतली असून त्यांच्या हातून यापुढील काळात देखील असेच सत्कार्य घडत राहील. – प.पु. सदगुरु रामगिरीजी महाराज.

चौकट :- टाळ मृदुंगाच्या गजरात साधू संत-महंतांचे आगमन, टाळ मृदुंगाच्या गजरात तल्लीन झालेले महिला पुरुष वारकरी, प्रभू श्रीराम, माता सीता, भ्राता लक्ष्मण, श्रीराम भक्त हनुमान व माता शबरीची वेशभूषा केलेल्या चिमुकल्यांनी कोपरगावकरांचे लक्ष वेधले. श्रीराम भक्तांना श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी जरी शरीराने जाता येणार नसले तरी श्रीराम भक्तांना मनाने अयोध्येला घेवून जाणारा अभूतपूर्व सोहळा ठरला. यावेळी ‘प्रभू श्रीरामांच्या’ जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. सुप्रसिद्ध गायिका अंजली गायकवाड हिच्या सुमधुर भक्तीगीतांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.
यावेळी कोपरगाव मतदारसंघातील विविध देवस्थानचे संत-महंत, तसेच वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, मृदुंगाचार्य, गायनाचार्य व भजनी मंडळ तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *