संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे किल्ले रायगडावर स्वच्छता मोहीम, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेवकांनी प्रत्यक्ष कृतीतून दिला मोलाचा संदेश …

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- महाराष्ट्रातीलच नव्हे तर अखंड भारतातील अगणित असे ऐतिहासिक गड-किल्ले हा आपला इतिहास आहे, वारसा आहे. त्यांचे विद्रुपीकरण न करता हा अमूल्य ठेवा आपण जपायला हवा, या उदात्त हेतूने कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे नुकतीच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांनी श्रमदान करून किल्ले रायगडावर साफसफाई केली. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या गड-किल्ल्यांची स्वच्छता व संवर्धन
करून ही राष्ट्रीय संपत्ती आपण जतन केली पाहिजे, असा संदेश संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांनी प्रत्यक्ष कृतीतून दिला आहे.
संजीवनी युवा प्रतिष्ठानने संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या आठ वर्षांत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वीरीत्या राबवून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘जागवूया ज्योत माणुसकीची’ या ब्रीद्वाक्यानुसार संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व युवा सेवक गेल्या आठ वर्षांपासून युवा सशक्तीकरण, सामाजिक एकता, पर्यावरण संवर्धन, कृषी, आरोग्य हे पाच उद्दिष्ट घेऊन नि:स्वार्थीपणे सामाजिक कार्य करत आहेत. नैसर्गिक आपत्तीच्या काळात नेहमीच जनतेच्या मदतीला धावून जाणाऱ्या विवेकभैय्या कोल्हे व युवा सेवकांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तसेच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याबरोबर कोरोना काळात संजीवनी डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ केअर सेंटर सुरू करून हजारो रुग्णांचे प्राण वाचवले. रक्तदान, आरोग्य शिबिरे, गरीब विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप, सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा, वृक्षारोपण, २४ तास ॲम्ब्युलन्स सुविधा, जलसंधारण, ग्राम स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, करिअर मार्गदर्शन असे विविध समाजोपयोगी उपक्रम प्रतिष्ठानतर्फे राबविले जातात.
जगाला सुशासन, राष्ट्रकल्याण, लोककल्याणाचा मार्ग दाखवणारे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गड-किल्ल्यांना महाराष्ट्राच्या इतिहासात एक मोलाचे स्थान आहे. मात्र, आज अनेक गड-किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे. हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवप्रेमींना व पर्यटकांना या परिसरात कचरा करू नये, असे वारंवार आवाहन करूनही अनेकजण रायगडावर कचरा टाकून निघून जातात. अस्वच्छतेच्या विळख्यात अडकलेल्या अशा किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आता फक्त इतिहासापुरते मर्यादित राहिले आहे. गड-किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव असून, त्यांचे विद्रुपीकरण न करता त्यांचे पावित्र्य जपत, हा ऐतिहासिक व पुरातन अमूल्य ठेवा जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. गड-किल्ल्यांची स्वच्छता व संवर्धन याचे महत्त्व युवकांना समजावे, यासाठी युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून किल्ले रायगडावर १६ नोव्हेंबर रोजी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.


यासाठी विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगावहून संजीवनी युवा प्रतिष्ठानची एक टीम किल्ले रायगडावर गेली होती. या पथकात रामदास गायकवाड, सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे, राहुल माळी, सतीश निकम, सागर राऊत, ऋषिकेश निकम, विशाल चोरगे, ऋषिकेश गायकवाड, अविनाश विधाते, कृष्णा खरोटे, राहुल लाड, पवन अहिरे, संकेत शिंगाडे, रुपेश सिनगर, अनिल गायकवाड, नीलेश बोरुडे, दीपक बारवकर, अभिजीत भागवत, विकी परदेशी, अभि सूर्यवंशी, सिद्धार्थ पाटणकर, विकी खर्डे, यश सूर्यवंशी, भूषण सूर्यवंशी, वैभव सोळसे, ओम बागुल, स्वराज सूर्यवंशी, भैय्या नागरे, अर्जुन मरसाळे, अमोल बागुल, ओम दुसाने आदी युवा सेवकांचा समावेश होता. या सर्व युवा सेवकांनी प्रत्यक्ष किल्ले रायगडावर जाऊन तेथे पडलेल्या पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या असा पर्यावरणाला हानीकारक असलेला कचरा उचलून स्वच्छता केली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या मोहिमेची सुरुवात झाली. स्वच्छता मोहिमेनंतर युवा सेवकांनी संपूर्ण किल्ले रायगडावर भ्रमंती करत शिवकालीन विविध वास्तू व साहित्यांची पाहणी केली. संजीवनी युवा प्रतिष्ठानने रायगडावर राबविलेल्या आदर्शवत स्वच्छता मोहिमेबद्दल युवा सेवकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
चौकट….
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ हिंदुस्थानचे नव्हे तर संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान आहेत. छत्रपती शिवरायांनी अत्यंत कठीण काळात हिंदवी स्वराज्य स्थापन करून आदर्श राज्यकारभार केला. हिंदवी स्वराज्याचा कणा असलेले शेकडो गड-किल्ले हा महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा असून, आपल्या पुढच्या पिढीला छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगायचा असेल तर गड-किल्ल्यांचे विद्रुपीकरण न करता ते वाचवले पाहिजेत. तरुणाईला गड-किल्ल्यांच्या स्वच्छता मोहिमेशी जोडून घेतले पाहिजे. संजीवनी युवा प्रतिष्ठानने सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून किल्ले रायगडावर स्वच्छता मोहीम राबवली. यापुढील काळातही असे उपक्रम राबविले जातील.
-विवेकभैय्या कोल्हे, संस्थापक अध्यक्ष, संजीवनी युवा प्रतिष्ठान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *