
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर झाला असून भीषण पाणी टंचाई आगामी काळात येणार आहे.अशा परिस्थितीत शेती पिके तरण्यासाठी पाण्याची आवर्तने वेळेवर होऊन त्याचे नियोजक आवश्यक आहे.त्याप्रमाणे कालवा सल्लागार समितीची बैठक येत्या १६ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार असून त्यात जायकवाडीला गोदावरी लाभक्षेत्राचे हक्काचे पाणी सोडून नगर नाशिकवर अन्याय होऊ देऊ नये तसेच पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवण्याचा निर्णय आगामी अधिवेशनात होऊन त्यासाठी भरीव निधी मिळावा यासाठी सर्वच राजकीय नेत्यांनी पाणी प्रश्न सुटण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेकभैय्या कोल्हे यांनी या निमित्ताने केली आहे.
ऐन सणासुदीच्या काळात पाणी सोडण्याचा वाद होऊ नये.पाणी प्रश्न सुटावा यासाठी आपला लढा सुरू असून सर्वच शेतकरी यावर आक्रमक आहेत.गोदावरी खोरे पाणी कृती समितीच्या माध्यमांतून लाक्षणिक उपोषण करून आपण शासनाला आगामी दिशा स्पष्ट केली आहे.कारण अतिघाईत जायकवाडीला पाणी सोडले गेल्यास नगर नाशिकची अडचण होऊन दुष्काळ असणाऱ्या कोपरगाव मतदारसंघात शेती उध्वस्त होऊ शकते.पाणी सोडून देखील अतिशय कमी प्रमाणात पाणी धरणात पोहचणार आहे त्यामुळे तो निर्णय केवळ पाण्याचा अपव्यय ठरेल.तसेच पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळविण्याचा निर्णय झाला आणि येत्या अधिवेशनात सर्वच लोकप्रतिनिधीनी शासनाकडे आग्रह धरला तर कायमचा हा पाणी सीमावाद संपून सर्वच शेतकरी सुखी होतील या दृष्टीने सामूहिक पावले टाकण्यासाठी आपण सर्वांना मागणी करत आहोत असे कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
मायबाप शासनाने पर्जन्यमान कमी झाल्याने शेती नुकसानीत आहे याचा विचार करावा.कोपरगाव मतदारसंघात पाणी टंचाई निर्माण होऊन पशू धन अडचणीत आहे अशा स्थितीत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचा निर्णय लवकर व्हावा अशी मागणी मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती त्याप्रमाणे सूचना होऊन कालवा सल्लागार समितीची बैठक होते आहे, ही आगामी शेती पिकांच्या नियोजनासाठी सकारात्मक बाब आहे.दुष्काळजन्य स्थिती असल्याने पाणी वाटपाचे नियोजन देखील सुरळीत होऊन कालवे फुटून पाण्याचा अपव्यय अनेक ठिकाणी होतो तो टळला जावा यासाठी देखील अधिकाऱ्यांना विनंती या निमित्ताने केली आहे.
