सनातनधर्मी हिंदू समाजाने सजग होण्याची आणि लोकशाही मार्गाने या सनातन धर्मविरोधी वक्तव्यांचा प्रतिवाद करण्याची आवश्यकता आहे:- सुनील घनवट….

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:- तामीळनाडूतील द्रवीड मुन्नेत्र कळघम या पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलीन यांनी सनातन धर्माविषयी द्वेषमुलक विधान केले. सनातन धर्माची तुलना संसर्गजन्य रोगाशी करून ते थांबले नाहीत, तर सनातन धर्म नष्टच करून टाकण्याची इच्छाही त्यांनी जाहीरपणे मांडली. सदर वक्तव्य हे हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणारे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘हेट स्पीच’ होते. तरीही महाराष्ट्रातील पत्रकार निखिल वागळे यांनी ‘उदयनिधी स्टॅलिनच्या मताशी मी सहमत आहे. सनातन धर्म हा एखाद्या रोगासारखा असून या धर्माची उत्पत्ती असलेल्या सनातन संस्थेकडे बघा,’ अशी पोस्ट फेसबुकद्वारे केली. हा एकप्रकारे सनातन धर्माचा अपमान आहे. महाराष्ट्रातील नास्तिकतावाद्यांच्या हत्येचा बादरायण संबंध धार्मिक संस्थांशी जोडून निरपराध्यांना अडकविण्याचे कारस्थान रचणार्यांमध्ये निखील वागळे अग्रणी होते. सहिष्णुतेची प्रवचने झोडून वॉर्ड वापसी करणार्या संधीसाधू साहित्यीकांच्या टोळीचे ते भक्त आहेत. ही ‘वॉर्ड’ वापसी टोळी उदयनिधी स्टॅलीनच्या विधानावर चकार शब्द काढायला तयार नाही. धर्म नष्ट होऊ शकत नाही, हे सनातन सत्य आहे. धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्यांच्या मनामध्ये धार्मिक समुहाचा वंशविच्छेद हेच ध्येय आहे. यासाठी महाराष्ट्रातील सनातनधर्मी हिंदू समाजाने सजग होण्याची आणि लोकशाही मार्गाने या सनातन धर्मविरोधी वक्तव्यांचा प्रतिवाद करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री सुनील घनवट यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरातील प्रिती भोजनालय, बैंक रोड, कोपरगाव येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


सहिष्णुता, बंधुत्व आणि विश्वकल्याण यांच्यासाठी सुपरिचित असणारा सनातन धर्म नष्ट करण्यासाठी अर्बन नक्षलवाद्यांकडून सातत्याने षडयंत्रे चालू आहेत. सर्वप्रथम जे.एन.यु. मध्ये ‘भारत तेरे टुकडे होंगे’च्या देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या. त्यानंतर ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ नावाने हिंदुत्व संपवण्यासाठी परिषदा घेतल्या गेल्या. त्या वेळी विरोध झाल्यावर ‘आम्ही हिंदु धर्माच्या विरोधात नाही, तर राजकीय हिंदुत्वाच्या विरोधात आहोत’, असा खुलासा केला गेला; मात्र आता तर ‘सनातन धर्म’ संपवण्याचीच भाषा केली जात आहे. ओवैसीच्या 100 कोटी हिंदूंना संपवण्याच्या भाषेपेक्षा हे वेगळे काय आहे ? ‘हेटस्पीच’च्या खटल्यात, सर्वोच्च न्यायालयातील प्रतिज्ञापत्रात महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांनी 30 गुन्हे नोंदवल्याचे सांगितले आहे. त्यातील बहुतांश गुन्हे सकल हिंदु समाजाच्या ‘हिंदु जनआक्रोश मोर्च्या’तील हिंदुत्ववादी वक्त्यांच्या विरोधात दाखल केले गेले आहेत. हे गुन्हे दाखल करण्याच्या मागे अर्बन नक्षलवाद्यांशी जोडलेल्या वामपंथी विचारसरणीच्या तिस्ता सेटलवाड यांच्या ‘सिटीझन फॉर जस्टिस अँण्ड पीस’ या संघटनेचा हात आहे; मात्र याच संघटनेने स्टॅलिन, प्रियांक खर्गे, निखिल वागळे, आव्हाड इत्यादींच्या विरोधात ‘हेटस्पीच’चा एकही गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे एकूणच सनातन धर्म संपवण्याचे हे डाव्या विचारसरणीच्या अर्बन नक्षलवाद्यांचे षड्यंत्र असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे हे षडयंत्र करणार्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासह त्यांची ‘एन.आय.ए.’ कडून चौकशी करण्यात यावी, अशी हिंदु जनजागृती समितीची मागणी आहे.
जिल्ह्यात 4 तालुक्यांत तक्रारी दाखल करणार ! श्री. प्रदीप देशमुख, हिंदु जनजागृती समिती
सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्यांच्या विरोधात सध्या समविचारी संघटनांच्या वतीने जागृतीपर सनातन धर्मरक्षण अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत जागृतीसोबत धर्मविरोधी शक्तींचा लोकशाही मार्गाने विरोधही केला जाणार आहे. कोपरगाव सह नगर जिल्ह्यात नगर शहरा, नेवासा, श्रीरामपूर या तालुक्यांत सनातन धर्माच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये करणायांच्या विरोधार तक्रारी दाखल करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *