‘विद्यार्थ्यांना व्यासपीठ व संधींची उपलब्धता देण्यासाठी वाणिज्य मंडळाची गरज’:- प्राचार्य डॉ.एल.डी.भोर…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
“आजचा काळ हा नवतंत्रज्ञानाबरोबरच वेळेचे व्यवस्थापन आणि व्यापार नियोजनाचा, कल्पक व्यवहाराचा काळ आहे. अशा काळात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याबरोबरच आपल्या कल्पकतेला वाव मिळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणे, नवनवीन संधींची माहिती होऊन त्या संधीमध्ये आपले कौशल्य दाखविता येणे गरजेचे आहे. यासाठी महाविद्यालयात वाणिज्य मंडळ असणे अत्यंत गरजेचे आहे” असे प्रतिपादन लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालय, मोखाडा येथील प्राचार्य डॉ. एल. डी. भोर यांनी केले. येथील एस. एस. जी. एम. कॉलेजच्या वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित ‘वाणिज्य मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी’ ते बोलत होते. आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी, एस. एस. जी. एम. महाविद्यालयाचा झालेला कायापालट, या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सोयी-सुविधा याबद्दल समाधान व्यक्त केले, तसेच हे एक गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे महाविद्यालय असून येथील विद्यार्थी कोठेही कमी पडता कामा नये अशीच सर्व घटकांची मनोमन भावना आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही या संधींचा वापर करून आपल्या भविष्याचे सोने करावे, चेहरे वाचण्यापेक्षा पुस्तके वाचण्यावर भर द्यावा. ज्या लोकांनी संघर्ष केला ते यशस्वी झाले, हे लक्षात घेऊन संघर्ष, स्वयंशिस्त, समयसूचकता या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, डॉ. आर. आर. सानप हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, सुसज्ज व संपन्न असलेल्या वाणिज्य विभागाचे कौतुक करून, कुणाही विद्यार्थ्यांनी स्वतःला कमी लेखू नये, संधींचा उपयोग करून घेऊन आपले करिअर घडवावे. वाणिज्य मंडळाने उपलब्ध करून दिलेल्या विविध उपक्रमात सहभागी होऊन आपल्या क्षमता ओळखाव्या, असे सांगितले.


सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून देताना वाणिज्य विभाग प्रमुख अर्जुन भागवत यांनी वाणिज्य विभागात चालविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रा. अक्षय आहेर व डॉ. सीमा चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा. संतोष महाले यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी वाणिज्य विभागातर्फे प्राचार्य अभिभाषणाचाही कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमातून प्र. प्राचार्य डॉ. आर. आर. सानप यांनी, ‘विद्यार्थी शिस्तप्रियता हीच महाविद्यालयाची संस्कृती असते’, असे सांगून विविध कोर्सेस, उपक्रम, सोयी सुविधा यांची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी या सर्वांचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले. तर प्रा. भोये यांनी वाणिज्य विभागातील उपक्रम, स्कॉलरशिप, परीक्षा पद्धती याविषयी माहिती दिली. डॉ. अर्जुन भागवत यांनी प्राचार्य अभिभाषणामागील हेतू कथन केला तर कार्यक्रमाचे आभार प्रा. संतोष महाले यांनी मानले.
या दोन्ही कार्यक्रमांना महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, कार्यालयीन अधीक्षक, यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *