
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोदावरी कालव्या लगतच्या गावतील रोहीत्रांचा वीज पुरवठा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासाठी किमान दोन तास कालव्या लगतच्या रोहीत्रांचा वीजपुरवठा सुरु करावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे केली आहे.
कोपरगाव मतदार संघाच्या अनेक गावातील गोदावरी डाव्या-उजव्या कालव्याच्या लगतच्या गावातील रोहीत्रांचा वीज पुरवठा ३ ऑक्टोबर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी महावितरणला दिले आहे. त्यामुळे नागरिकांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होवून पाण्याचे उद्भव देखील कोरडेठाक पडण्यास सुरुवात झाली आहे. विहीर, बोअर वेलच्या माध्यमातून शिल्लक असलेले पाणी वीजपुरवठा खंडीत करण्यात आल्यामुळे नागरिकांना व जनावरांना पिण्यासाठी पाणी देखील मिळणे दुराप्रास्त झाले आहे. त्यामुळे पाणी असून देखील शेतकरी व कालव्या लगत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे या कालव्यांलगतच्या गावातील रोहीत्रांचा किमान दोन तास वीजपुरवठा सुरु करावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे केली आहे.
तसेच कोपरगाव मतदार संघात वाढत असलेल्या भारनियमानामुळे शेतकऱ्यांपुढे अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. सर्वत्र पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांना विहिरी, बोअर वेल मधून उपलब्ध असणारे पाणी पिकांना व पिण्यासाठी देखील खंडीत वीजपुरवठ्यामुळे मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा व शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार याची काळजी घ्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य वीज वितरणच्या मुख्य अभियंत्यांकडे आ. आशुतोष काळे यांनी केली आहे.
