
कोपरगाव प्रतिनिधी:- समता इंटरनॅशनल स्कूलने सलग दहाव्या वर्षी यशाची दैदिप्यमान पताका दिमाखात फडकावत शैक्षणिक क्षेत्रात नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ मध्ये घेतल्या गेलेल्या सीबीएसई इ १० वी परीक्षेत ९२ टक्के विद्यार्थ्यांनी ७०% पेक्षा अधिक गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी बजावली तर ५० टक्के विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवत सर्वोत्कृष्टतेची नवी उंची गाठली आहे. या दैदिप्यमान निकालात विद्यार्थ्यांनी अक्षरशः गुणांचा वर्षाव करत आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवली आहे.
या उज्ज्वल यशामागे शाळेच्या कार्यकारी विश्वस्त सौ स्वाती संदीप कोयटे यांचे प्रेरणादायी व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, प्राचार्य समीर अत्तार यांचे अचूक नियोजन आणि सर्व शिक्षकांचे सखोल व अखंड मार्गदर्शन महत्वपूर्ण ठरले असून त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेला केवळ दिशा दिली नाही तर त्यांच्यात यशाची ज्वाला प्रज्वलित केली आणि त्यातूनच हा दैदिप्यमान यशोमहोत्सव साकार झाला.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांचे हे यश केवळ गुणांचे नाही तर त्यांच्या अथक परिश्रम, शिस्त आणि स्वप्नपूर्तीच्या जिद्दीचे जाज्वल्य प्रतीक आहे. समता इंटरनॅशनल स्कूलचा प्रत्येक विद्यार्थी हा उद्याचा सक्षम आणि सजग नागरिक आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. पुढील काळातही आम्ही उत्कृष्टतेच्या नव्या उंची गाठण्यासाठी कटिबद्ध राहू.’
तसेच समता इंटरनॅशनल स्कूलचा हा निकाल म्हणजे केवळ आकडे नाहीत तर स्वप्नांची परिपूर्णता, मेहनतीची ताकद आणि यशाची नवप्रेरणा आहे. १० वर्षांच्या प्रवासात समता इंटरनॅशनल स्कूलने केवळ निकाल दिले नाहीत, तर उद्याचे प्रेरणादायी, सक्षम आणि ध्येयवेडे नागरिक घडवले, याची ही ठोस साक्ष आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांवर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्ग यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला असून त्यांच्या या उल्लेखनीय यशाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
चौकट : समता इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई इ १० वी परीक्षेत आर्या दीपिका राहुल सांड या विद्यार्थिनीने ९९ % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर राजेश्वरी सुरेखा चैतन्य तांबे हिने ९८ % गुणांसह द्वितीय स्थान पटकावत सामाजिक शास्त्र विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून नेत्रदीपक यश संपादन केले. यासह दृष्टी पुनम खुशाल ठाकूर यांनी ९७ % गुण मिळवत तृतीय क्रमांकावर आपले नाव कोरले. तसेच माहिती तंत्रज्ञान (IT) विषयात ११ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.
