
कोपरगाव येथे १० वी १२ वी च्या गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- ईयत्ता १० वी १२ वीच्या परीक्षेत मिळविलेल्या गुणांमुळे आत्मविश्वास द्विगुणीत होतो. चांगल्या गुणांना चांगल्या आचरणाची जोड द्या. आपल्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी करून आपल्या तालुक्याचे नाव केवळ देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर उज्वल करा असा मौलिक सल्ला आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे १० वी १२ वीच्या परीक्षेत दैदिप्यमान यश मिळविलेल्या गुणवंतांना दिला.
कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ईयत्ता १० वी १२ वीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविलेल्या गुणवंतांचा व त्यांच्या पालकांचा आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सुपरस्टार अंकुश चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण होते.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, आपल्या परिस्थितीचा बाऊ करू नका. तुमच्याकडे असलेली अलौकिक बुद्धी तुमची ताकद आहे. या बुद्धीच्या जोरावर तुम्ही निश्चितपणे यशाचे उंच शिखर गाठणार असा विश्वास व्यक्त केला. आपल्या यशात आपल्या आई वडिलांचा देखील मोठा त्याग असतो याचा विसर पडू न देता आई वडील व ज्येष्ठ व्यक्तींचा नेहमी आदर करून निवड केलेल्या मार्गावर आत्मविश्वासाने वाटचाल करून आपले स्वप्न पूर्ण करा अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रसिद्ध अभिनेते सुपरस्टार अंकुश चौधरी म्हणाले की, गुंणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देवून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी राबविला जाणारा गुणवंतांच्या सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम कौतुकास्पद आहे. १० वी १२ वी हा जरी आयुष्याचा टर्निंग पॉइंट असला तरी गुणवंतांनी ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत त्यांचे गुण वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारे लोकप्रतिनिधी आ. आशुतोष काळे यांच्या रूपाने लाभले आहेत. त्यामुळे सर्व गुणवंत कोपरगाव तालुक्याचे नाव निश्चितपणे राज्य व देश पातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर उज्वल केल्याशिवाय राहणार नाही असे आपल्या मनोगतात सांगितले. तसेच यावेळी त्यांनी २३ वर्षापूर्वी कोपरगावला आलेल्या आठवणींना उजाळा देवून त्यावेळी रंगमंचावर घडलेल्या गमती जमती सांगितल्या.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,शहराध्यक्ष सुनील गंगुले, युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, महिला शहराध्यक्षा सौ.प्रतिभा शिलेदार, युवती तालुकाध्यक्षा सौ. वैशाली आभाळे, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन दिलीपराव बोरनारे, गौतम बँकेचे चेअरमन सुधाकर दंडवते, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचे चेअरमन देवेन रोहमारे तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व सर्व संलग्न सहकारी संस्थांचे व्हा. चेअरमन, आजी माजी संचालक, जिल्हा परिषद,पंचायत समितीचे माजी सदस्य, माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर, गुणवंत विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक अॅड.विद्यासागर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन अरुण चंद्रे, सौ.विमल राठी यांनी केले .


फोटो ओळ:- ईयत्ता १० वी १२ वीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविलेल्या गुणवंतांचा व त्यांच्या पालकांचा गौरव करतांना आ. आशुतोष काळे समवेत प्रसिद्ध अभिनेते सुपरस्टार अंकुश चौधरी व मान्यवर.
