कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कै. के.बी. रोहमारे यांनी राजकारण व समाजकारण याबरोबरच शिक्षण, कला, साहित्य, शेती, सहकार व साखर कारखानदारी आदी क्षेत्रात मोलाची कामगिरी:- अध्यक्ष अशोकराव रोहमारे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
“कोपरगाव तालुक्याचे माजी आमदार व कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कै. के.बी. रोहमारे उर्फ दादा यांनी राजकारण व समाजकारण याबरोबरच शिक्षण, कला, साहित्य, शेती, सहकार व साखर कारखानदारी आदी क्षेत्रात मोलाची कामगिरी करून कोपरगाव सारख्या तत्कालीन दुर्गम ग्रामीण परिसराला विकासाची गंगा दाखवली. के.बी. साहेब म्हणजे एक दूरदृष्टी संपन्न, निगर्वी व पारदर्शी व्यक्तिमत्व होते. राजकारणात नैतिकता आणि प्रामाणिकपणा केंद्रस्थानी ठेवून शेवटपर्यंत ग्रामीण भागासाठी ते झटले,” असे प्रतिपादन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष अशोकराव रोहमारे यांनी येथे केले. स्थानिक के.जे. सोमैया वरिष्ठ व के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात कै.के.बी.रोहमारे यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित समारंभात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
श्री रोहमारे पुढे म्हणाले की, ” के. बी. दादा यांचा अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या स्थापनेत पुढाकार होता व या बँकेचे ते संस्थापक व्हा. चेअरमन होते. कोपरगाव परिसरात पहिल्यांदा वीज त्यांनी आणली. १९५७ ते १९७६ पर्यंत ते गोदावरी-प्रवरा कॅनॉल सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन होते. या काळात के. बी. दादांनी या संघाला महाराष्ट्रातील अग्रगण्य संघ बनवले.”
या प्रसंगी के.बी.साहेब यांच्या कार्य-कर्तृत्त्वावर विस्तृत प्रकाश टाकतांना प्रो.डॉ. विलास आवारी म्हणाले की,” १९५२ व १९८० पर्यंत अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणावर के.बी.साहेबांचा पगडा होता. या काळात राजकारण, समाजकारण व सहकार क्षेत्रात के.बी.साहेबांनी केलेले कार्य आभाळाएवढे प्रचंड मोठे आहे. के.बी.दादांची धारणा होती की, प्रत्येक गावात जसे मारुतीचे मंदिर असते, तसेच प्रत्येक गावात सहकारी सोसायटी असावी. त्यांनी १०० पेक्षा जास्त सहकारी सोसायट्या स्थापन करून शेतकरी व शेतमजुरांच्या विकासाची पायाभरणी केली. आर्थिक अडचणींवर मत करून अनेक संस्था सुरु केल्या. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांचे ते के.बी.दादा अत्यंत विश्वासू सहकारी होते.”संस्थेचे सचिव ऍड. संजीव कुलकर्णी म्हणाले की, ” राजकारण व समाजकारणात अग्रेसर असलेले के.बी.साहेब व्यक्तीगत जीवनात देखील खूप मोठे होते. त्यामुळे मला राजकीय क्षेत्रातील दादांऐवजी घरघुती वातावरणात रमणारे ‘दादा’ अधिक प्रिय होते. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांच्यासोबत वावरतांना ते खूप मोठे आहेत असे मला कधीच वाटले नाही. कुणाकडूनही विनामूल्य सेवा न घेणे हा त्यांचा स्वभावधर्म होता. प्रत्येक कार्यात आग्रही व निग्रही असणारे दादा आम्हाला सतत प्रेरणा देत राहतील.” संस्थेचे विश्वस्त चंद्रशेखर कुलकर्णी म्हणाले की, “के. बी. साहेबांसारख्या महान व्यक्तिमत्वास आदरांजली वाहण्याचा सन्मान मला मिळाला हे मी माझे भाग्य समजतो. मला तरुण वयात कै. पंडितराव कुलकर्णी, कै. वसंतराव कोऱ्हाळकर या सारख्या तत्कालीन प्रतिष्ठित व्यक्तींसोबत अनेक वेळा त्यांचा सहवास लाभला. या महान व्यक्तींच्या तत्वनिष्ठ राजकारण व समाजसेवेमुळेच आज सोमैय्या कॉलेज एक आदर्श कॉलेज ठरले आहे.”
या प्रसंगी के. बी. दादांचे निस्पृह सेवक श्री. पांडुरंग वाबळे व श्री. बाळासाहेब वेताळ यांचा मा. अशोकराव रोहमारे व मा. रावसाहेब रोहमारे भेटवस्तू देऊन हृद्य सत्कार केला. या समारंभाचे प्रास्ताविक व स्वागत करतांना प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी कै. के. बी. साहेबांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा थोडक्यात परिचय करून दिला तर संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. शैलेंद्र बनसोडे यांनी केले. या कार्यक्रमाला के.बी.दादांवर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच को.ता.एज्यु.सोसायटीचे विश्वस्त मा. जवाहर भाई शहा, मा. सुनील शिंदे, मा. सुनील बोरा, मा. सुधीर डागा, मा. ऍड. राहुल रोहमारे, मा. सुजित रोहमारे, आदी अनेक मान्यवर तसेच प्राध्यापक व सेवकवृंद बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. जे.एस.मोरे, रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे, डॉ.व्ही.सी. ठाणगे, डॉ. एस.एल. अरगडे, आदींनी विशेष परिश्रम घेतले.

फोटो ओळी:- जन्मशताब्दी निमित्त कै.के.बी.रोहमारे साहेबांना अभिवादन करतांना मा.अशोकराव रोहमारे व मा. रावसाहेब रोहमारे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *