
कोपरगाव प्रतिनिधी:- शहरामध्ये विकास कामांचा डोंगर उभा करतांना शहरवासियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अद्यावत सोयीसुविधायुक्त फायर स्टेशन उभारण्यास प्राधान्य दिले, आज पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे नाव दिले जात असल्याने आमच्यासाठी निश्चितच भाग्याचा क्षण आहे. असे उदगार भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी काढले.
कोपरगाव शहराच्या सुरक्षितेच्या दृष्टीने विचार करून शासनदरबारी पाठपुरावा शहरासाठी अद्यावत फायर स्टेशन असावे, म्हणून प्रयत्न केले. त्या प्रयत्नातून शहरासाठी फायर स्टेशनची उभारणी केली. दुदैवाने काही दुर्घटना घडल्यास सदरच्या सेवेची नितांत गरज होती. संकटकाळी धावुन येणा-या संजीवनी उदयोग समूहाच्या अग्निशामक सेवेमुळे अशा दुर्घटनांच्यावेळी मदत मिळत आहे, परंतु तरीही शहरामध्ये फायर स्टेशन असावे म्हणून आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. अग्निसुरक्षा अभियान राज्यस्तरीय योजनेअंतर्गत सुमारे 74 लाख रूपये खर्चाच्या सर्वसोयीनीयुक्त फायर स्टेशनची उभारणी केली. शहराच्या वैभवात भर घालणारी सुसज्ज इमारत उभी करून शहरातील जनतेची सुरक्षितता जपण्याचे काम या माध्यमातून करता आले. हे सुसज्ज इमारतीस पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांचे नाव दयावे म्हणून भारतीय जनता पार्टी आग्रही राहिली, त्यासाठी नगरसेवकांनी एकमुखी मागणी केली. आज या इमारतीस पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांचे नाव दिले जात आहे. ही आमच्यासाठी निष्चितच अभिमानाची बाब असून भाग्याचा क्षण असल्याचे सौ कोल्हे म्हणाल्या.
