
कोपरगाव प्रतिनिधी:-
भारताला असंख्य स्वातंत्र्यवीरांचा त्याग आणि बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य मोलाचे आहे. स्वातंत्र्याचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी ‘सत्यमेव जयते’ या ब्रीदाचे पुरस्कर्ते होवून स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करु या ! . ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’निमित्त ‘घरोघरी तिरंगा’ अभिमानाने फडकविण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने उत्स्फूर्त सहभागी होण्याचे आवाहन सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी केले आहे.भारत सरकारचे वतीने ‘भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी’ वर्षानिमित्त ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचे माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

१३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान प्रत्येक भारतीयाने आपल्या घरावर भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा अभिमानाने फडकविण्याचे आवाहन भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानासाठी नोंदणी प्रक्रिया करता प्रथमतः अभियानाच्या https://harghartiranga.com या अधिकृत वेबसाईट वर जावे. वेबसाईट ओपन झाल्यावर ‘पिन अ फ्लॅग’या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर तुमचा प्रोफाइल अपलोड करून, तुमचे नाव व मोबाईल नंबर एंटर करून नेक्स्ट या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर ऑटोमॅटिक तुमचा लाईव्ह ऍड्रेस शोधला जातो. ‘पिन्ड अ फ्लॅग’ या बटनावर क्लिक करताच यशस्वीपणे तुमच्या घराच्या ठिकाणी तिरंगा फडकावलेला दिसून येतो. त्यानंतर ‘घरोघरी तिरंगा’आपण या अभियानात सहभागी झाल्याचा प्रमाणपत्र डाऊनलोड करून घेता येते…प्रत्येकाने आपापल्या घरावर तिरंगा उभारतांना भारत सरकारने घालून दिलेल्या ध्वजसंहितेचे आणि नियमांचे पालन करावे. तिरंगा फडकवितांना केशरी रंग वरच्या बाजूने असावा. घरो घरी तिरंगा हा दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत फडकलेला असेल तर दररोज सायंकाळी उतरविण्याची आवश्यकता नाही. तिरंगा झेंडा उतरवितांना काळजीपूर्वक सन्मानाने उतरवावा.

१३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमांतर्गत लावण्यात आलेले झेंडे अभियान कालावधीनंतर प्रत्येकाने सन्मानाने आणि सुरक्षित ठेवावे. अर्धा झुकलेला, फाटलेला, कापलेला झेंडा कुठल्याही परिस्थितीत लावला जावू नये. राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि शान अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक सर्व काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे…
