ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ आर पीपेक्षा जास्त दर देण्याची काळे कारखान्याची परंपरा कायम दुसरा हफ्ता प्र.मे. टन १०० रुपये १० दिवसात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर:- ना. आशुतोष काळे…

Uncategorized

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ६७ व्या गळीत हंगामाची यशस्वी सांगता…
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच एफ. आर.पी. पेक्षा जास्त दर देण्याची परंपरा २०२१-२२ च्या गळीत हंगामात देखील अखंडपणे सुरु ठेवली आहे. चालू वर्षीची एफ. आर. पी. १०% उताऱ्यासाठी ऊस तोडणी व वाहतूक खर्च वजा जाता २२०६.७८ रुपये प्र.मे.टन येत असली तरी गळीतास आलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यापूर्वी प्र.मे.टन २५०० प्रमाणे रक्कम अदा केलेली आहे. एफ आर. पी पेक्षा जादा दर देण्याची आपली परंपरा असल्यामुळे चालू वर्षीच्या गळीतास आलेल्या ऊसाला अधिक १०० रुपये प्र.मे. टन दुसरा हफ्ता देणार असून हि रक्कम येत्या १० दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी कारखान्याच्या २०२१/२२ च्या ६७ व्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभ प्रसंगी दिली आहे.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ६७ व्या गळीत हंगामाची सांगता कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक मा.आ.अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे विद्यमान चेअरमन तथा श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक विश्वासराव आहेर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. राजनंदाताई विश्वासराव आहेर यांच्या शुभहस्ते श्री सत्यनारायण महापूजा करून करण्यात आली याप्रसंगी ना.आशुतोष काळे बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, मा.खा.कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हित साधण्याच्या आदर्श विचारांवर कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. मागील दोन वर्ष चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे चालू वर्षीचा हंगाम हा अतिरिक्त ऊस उपलब्धतेचा हंगाम ठरला. २१३ दिवस चाललेल्या गळीत हंगामात विक्रमी ७ लाख ९७ हजार ६८७ मे. टन ऊसाचे गाळप झाले असून ८ लाख ७७ हजार ५०० क्विंटल साखर पोती उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा ११% मिळाला आहे.

राज्यातील सर्व कारखान्यांचा ऊस उपलब्धतेचा अंदाज चुकला. कारखान्याकडे सुरवातीला १० हजार ५०० हेक्टर ऊस नोंद झालेली होती यातुन ५०० हेक्टर बेणे, चारा वापर इत्यादी वजा जाता ७० मेट्रिक टन प्रति हेक्टरी प्रमाणे एकूण ७ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होईल असा अंदाज होता त्यामुळे गेटकेन सेंटर वरून ऊस नोंदी घेतल्या नाही. सुरुवातीपासूनच कठोर भूमिका घेवून कार्यक्षेत्रातील ऊस गाळपाला प्राधान्य दिले त्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस गाळपा अभावी उभा राहिला नाही.
फेब्रुवारी महिन्यापासूनच तापमानात वाढ झाल्यामुळे ऊस तोडणी मजुरांची अडचण जाणवली. त्यावेळी शेतकी विभागाला सूचना देऊन जास्तीत जास्त केन हार्वेस्टर उपलब्ध करून नोंदवलेला सर्व ऊस गाळप करण्याच्या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांना यश आले. या पुढील काळात देखील उष्णतेचे प्रमाण असेच राहिल्यास जास्तीत ऊस हा केन हार्वेस्टर ने तोडणी करावा लागणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी पाच फूट रुंद सरीच्या ऊस लागवडी करावे असे आव्हान केले.
चालू हंगामात जागतिक स्तरावर जवळपास ४० ते ६० लाख मेट्रिक टन साखरेचा तुटवडा निर्माण झाला तसेच रशिया व युक्रेनच्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे इथेनॉल निर्मिती कडे सर्व देशांचा कल वाढला. याचा परिणाम जागतिक स्तरावर साखरेचा दर वाढण्यात झाला. देशाला साखर निर्यातीचा मोठी संधी प्राप्त झाली या संधीचा देशातील संपूर्ण साखर कारखानदारी लाभ घेत आहे. आपल्या कारखान्याने देखील या संधीचा लाभ घेतला असून १९ मार्च पासून कच्ची साखर तयार करण्यास प्रारंभ केला. टप्प्याटप्प्याने कच्च्या साखरेचे निर्यातीचे सौदे करून एकूण २ लाख ७९ हजार क्विंटल साखर निर्यात करण्याची करार करून आज अखेर प्रत्यक्षात २ लाख ३३ हजार क्विंटल कच्ची साखर डिस्पॅच झाली आहे. जास्तीत जास्त कच्ची साखर निर्यात करून कारखान्याचा साखर साठा कमी कसा राहील, जेणेकरून माल तारण कर्जाच्या व्याजाचा बोजा कमी राहील व पुढील हंगाम सुरू करतांना १ ते १.५० लाख क्विंटल साखर राहिली पाहिजे या सर्व आर्थिक गोष्टींचा विचार करून कच्ची साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला. देशांतर्गत चालू हंगामाच्या सुरुवातीचा साखर साठा ८५ लाख मेट्रिक टन होता. चालू हंगामात देशात ३५५ लाख मे. टन साखर उत्पादन होईल. आज आखेर ९० लाख मे.टन साखर निर्यातीचे करार झाले असून प्रत्यक्षात ७९ लाख मेट्रिक टन साखर बंदरातून निर्यात झाली आहे. मागील दोन वर्षात केंद्र सरकारने निर्यात अनुदान देऊन साखर कोटा दिलेला होता परंतु चालू वर्षी कोणत्याही प्रकारचे अनुदान नसतांना देखील साखर कारखान्यांनी स्वयंस्फूर्तीने साखर निर्यातीचे सौदे केले असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
गळीत हंगाम अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी केल्याबद्दल सर्व सभासद, कर्मचारी, अधिकारी त्याचप्रमाणे गोदावरी खोरे व गौतम केन ट्रान्सपोर्टच्या सर्व ऊस तोडणी कामगारांचे व ट्रक धारकांचे आभार मानले. यावेळी अनिलराव शिंदे, सौ.स्नेहलता शिंदे, व्हाईस चेअरमन सुधाकर रोहम, सर्व संचालक मंडळ,कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे, आसवणीचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बी.बी.सय्यद,असि. सेक्रेटरी एस.डी. शिरसाठ, तसेच सर्व सलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे यांनी केले. सूत्रसंचालन संचालक अरुण चंद्रे यांनी केले तर आभार संचालक बाळासाहेब बारहाते यांनी मानले.

फोटो ओळ:- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ६७ व्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभ प्रसंगी बोलतांना कारखान्याचे चेअरमन ना.आशुतोष काळे समवेत मा.आ.अशोकराव काळे,अनिलराव शिंदे, सौ.स्नेहलता शिंदे.व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम, संचालक विश्वासराव आहेर, सौ. राजनंदाताई आहेर आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *