
कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी अर्थशास्त्र विभागांतर्गत बहुव्यापक योजना कार्यरत आहे. सदर योजनेअंतर्गत कंत्राटी/कराराधारित पदभरतीसंदर्भात फेब्रुवारी महिन्यात विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
मात्र, राहुरी विधानसभा मतदारसंघातील आचारसंहितेमुळे सदर पदभरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून, आचारसंहिता उठल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचे सुधारित पत्रक (Corrigendum) विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
दरम्यान, काही समाज माध्यमांद्वारे या भरती प्रक्रियेबाबत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जात आहे. सदर भरती ही केवळ कराराधारित असूनही ती शासनाची कायमस्वरूपी भरती असल्याचा चुकीचा प्रचार केला जात आहे. तसेच, निवड प्रक्रियेत सर्व अर्जदारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल असेही चुकीचे दर्शविण्यात येत आहे.
प्रत्यक्षात, अधिसूचनेनुसार उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव व संबंधित क्षेत्रातील विशेष कामगिरी या निकषांवर गुणांकन करून अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर १:३ या प्रमाणात (प्रत्येक पदासाठी ३ उमेदवार) पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
समाज माध्यमांवरील अशा चुकीच्या माहितीमुळे उमेदवार व त्यांच्या पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे इच्छुकांनी केवळ महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीवरच विश्वास ठेवावा व अधिक माहितीसाठी तेथेच भेट द्यावी, असे आवाहन कृषी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र हिले यांनी केले आहे.
