
कोपरगांव प्रतिनिधी:- पाशवी बहुमताच्या जोरावर अनेक विकासकामे नामंजूर करणाऱ्या कोल्हे गटाला जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे चपराक बसून शहरवासीयांना न्याय मिळाला आहे. स्वतःच्याही प्रभागातील विकासकामे नामंजूर करण्याचा मूर्खपणा महाराष्ट्रात कुणीही केलेला नसावा. तो मूर्खपणा कोल्हे गटातील 2-4 नगरसेवकांनी केलेला आहे.
मी व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी जिल्हाधिकारी साहेबांकडे 308 कलमा अंतर्गत अपिल दाखल केले. आमदार आशुतोष काळे, अभियंता वाघ साहेब, गोर्डे साहेब, राष्ट्रवादीचे सर्व, शिवसेनेचे दोन व एक अपक्ष नगरसेवक व ऍड. विद्यासागर शिंदे यांच्या सक्रिय सहकार्यामुळेच हा न्याय मिळालेला आहे. सर्वच कामे नियमाप्रमाणे, सर्व प्रकारच्या मान्यता घेऊन, निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, अभियंता वाघ व बांधकाम विभागाने घेतलेली मेहनत प्रशंसनीय आहे. 4 वर्षे प्रभागातील कामे करतांना गोड बोलत राहिले. पण शहरातील प्रमुख रस्ते झाले तर नगराध्यक्ष वहाडणे यांना श्रेय मिळेल म्हणून नेत्यांच्या आदेशावरून कोल्हे गटाने विरोध सुरू केला हे जनतेला कळून चुकलेले आहे.
“तुम्ही कामे नामंजूर करा- तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची” अशा प्रवृत्तीच्या नेत्यांमुळेच शहर विकास खोळंबतो. नेत्यांना खुश करण्यासाठी स्वतःच्याच प्रभागातील नागरिकांवर अन्याय करणाऱ्या कोल्हे गटाला जाहीरपणे सांगतो कि, प्रत्येक प्रभागात किमान एक ते दिड कोटी रूपयेची विकासकामे केलेली आहेत. तुम्हीच नामंजूर केलेली 28 कामे या निर्णयानंतर तरी करायचीत कि नाही? तुमच्या नेत्यांना विचारून मला सांगा. तुमची इच्छाच नसेल तर मी नागरिकांना विचारून निर्णय घेतो.
लोकनियुक्त नगराध्यक्षांना असलेले अधिकार माहित करून घ्या. नगराध्यक्ष व निविदा समितीला अनेक अधिकार आहेत. तरीही मनमानी न करता सर्वसाधारण सभेपुढे सर्व विषय ठेवले जातात. अधिकारांचा योग्यच वापर केला जाईल. कुणावरही अन्याय होणार नाही. पण ठेकेदाराच्या आडून उद्योग करणाऱ्याना उघडे पाडले जाईल. नेत्यांना खुश करण्याच्या नादात नागरिकांच्या हितास बाधा आणू नका. माजी आमदार म्हणतात कि बिले काढण्यासाठीच 2 कोटी रूपये निधी पळविला. 2 कोटींचा हिशोब द्यायला मी तयार आहे, पण तुम्ही आमदार असतांना 400 कोटींचा निधी आणला-त्याचा हिशोब तुम्ही देणार का? मी त्याबाबत सविस्तरपणे नंतर बोलणारच आहे.
निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसे कोल्हे गटाचे राजकिय चाळे वाढतच जाणार आहेत. अजूनही संधी गेलेली नाही. सर्वांनी सहकार्य केले तर उर्वरित काळात अजूनही विकासकामे आपण करू. पण असाच आडमुठेपणा करत रहाल तर त्याच पद्धतीने प्रतिसाद दिला जाईल. दररोज कागदपत्रांच्या कुठल्या ना कुठल्या नकला मागणारे कोल्हे गटाचे काही नकलाकार नगरसेवक व 2-4 संजीवनीचे सहाय्यक हे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा नाहक वेळ वाया घालवून कामकाजात अडथळे आणत असतात. त्यांनी महत्वाच्या कामाशिवाय अधिकाऱ्यांचा जास्त वेळ घेऊ नये ही विनंती व अपेक्षा.
विजय वहाडणे
नगराध्यक्ष,
कोपरगांव नगरपरिषद, कोपरगाव.
