
कोपरगाव प्रतिनिधी-
मुंबई वांद्रे परिसरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रतिज्ञापत्रे सापडल्या प्रकरणी कोपरगाव शहरात मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तीन दिवसांपासून ठाण मांडून बसले होते. त्यांनी तीन दिवसात २०० प्रतिज्ञापत्रांची पडताळणी केली असून त्यात एकही प्रतिज्ञापत्र आक्षेपार्ह नसल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सानप यांनी दिली आहे.
सर्व शिवसैनिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिज्ञापत्र उद्धव साहेबांचे समर्थनार्थ करून दिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी आम्ही सर्व शिवसैनिक एकत्रित आहोत. उद्धव साहेबांना बाळासाहेबांनी तलवार तलवार देत सर्व शिवसैनिकांना जो संदेश दिला होता की “माझ्यानंतर तुम्ही सर्व शिवसैनिक उद्धव साहेबांना व आदित्य साहेबांना सांभाळा आणि या महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घ्या” म्हणूनच आम्ही सर्व शिवसैनिक उद्धव साहेबांसोबत आहोत. बाळासाहेबांच्या विचारांनी चाललेली संघटना ४०-५० वर्षांपासून आहे त्याला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही. त्यामुळे आम्ही सर्वजण उद्धव साहेबांसोबत होतो आहे आणि सदैव राहू अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.
याच घडामोडींवर शहरप्रमुख दडियाल यांनी बोलताना सांगितले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील सर्व आमदार,खासदार यांना सर्व काही दिले तरी त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेसोबत दगाबाजी करत भाजपाच्या मदतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हायला भाग पाडले असून त्यांनी कितीही दबाव तंत्र वापरून आम्हा निष्ठावंत शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांची साथ सोडायला लावली तरी आम्ही शिवसैनिक कदापिही ठाकरे यांना सोडून कुठे जाणार नाहीत.
तसेच अहमदनगर उत्तर चे संपर्कप्रमुख माजी मंत्री बबननाना घोलप व अहमदनगर उत्तर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ पहिल्या टप्प्यात १ हजार तर दुसऱ्या टप्प्यात २०० शपथ पत्र निष्ठावंत शिवसैनिकांनी स्वखुशीने दिली असून अजूनही हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असलेल्या शिवसेनेसाठी जे काही करण्याची गरज भासेल ते आम्ही राज्यभरासह कोपरगावचे शिवसैनिक नक्कीच करू आणि आम्ही सदैव उद्धव ठाकरेंच्या शिवसेने सोबतच राहू असा पक्का निर्धार सध्या सुरू असलेल्या घडामोडीवर भाष्य करतांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कोपरगाव शहर प्रमुख कलविंदर डडियाल यांनी व्यक्त केला.
