शेतकऱ्यांनी केला कुलगुरूंचा वाढदिवस साजरा…


बदलत्या हवामानात शेतीचे योग्य नियोजन गरजेचे:- कुलगुरू डॉ विलास खर्चे…
कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
बदलते हवामान आणि पाऊसमानानुसार शाश्वत शेतीचे नियोजन आणि विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब ही आजची गरज आहे. भारतीय मान्सून आणि शेतकरी यांचे नाते हे अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळे बदलत्या हवामानानुसार शाश्वत, खात्रीशीर आणि हवामान आधारित पीकपद्धती वृद्धिंगत करणे ही आजची गरज आहे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कृषि विकास योजनेच्या पौष्टिक तृणधान्याचे उत्पादन आणि मूल्यसाखळी कार्यक्रमांतर्गत बाजरी उत्पादन तंत्रज्ञान कार्यक्रमाचे आयोजन पिंपळेश्वर महादेव मंदिर, श्री क्षेत्र ताहराबाद (ता. राहुरी) येथे करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे प्रमुख अन्वेषक आणि कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. पंडित खर्डे, प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. दत्तात्रय पाचरणे, डॉ. सुनील आडंगळे, तालुका कृषि अधिकारी श्री. बापूसाहेब शिंदे, प्रसारण केंद्रप्रमुख डॉ. सचिन सदाफळ, डॉ. योगेश बन,कृषि तंत्रज्ञान शिक्षण विभागाचे श्री. अशोक हारदे, सरपंच श्री. निवृत्ती घनदाट उपस्थित होते.
यावेळी या कार्यक्रमात ‘खेत बचाओ अभियान- 2026 ‘ भित्तिपत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. प्रशांत बोड़के यानी त्यांच्या मार्गदर्शनात पौष्टिक तृणधान्यांचे महत्व विशद केले. सर्वांनी आपल्या आहारात पौष्टिक तृणधान्य जसे की बाजरी आणि नाचणी याचा समावेश करावा. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने बाजरीची लागवड करावी असे आवाहन केले. डॉ. पंडित खर्डे यानी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. कृषी तंत्रज्ञान शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता व ज्वारी सुधार प्रकल्पाचे प्रमुख डॉ. विजू अमोलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा उपक्रम राबविला जात आहे. डॉ. दत्तात्रय पाचरणे यांनी बाजरी लागवड करताना जमीन व पाण्यानुसार वाणाची निवड, बीज प्रक्रिया व वेळेवर पेरणी, संतुलित खतांचा वापर, आंतरमशागत आणि पीक संरक्षण या बाजरी उत्पादनाच्या पंचसूत्री शेतकऱ्यांना सांगितल्या. यावेळी अशोक हारदे व निवृत्ती घनदाट यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी ताहराबाद येथील ग्रामपंचायत उपसरपंच रमेश हारदे, पप्पूशेठ माळवदे, उपसरपंच, जालिंदर मुंढे, नानासाहेब नालकर, वसंत बिडवे, तान्हाजी झावरे, गोकुळ नालकर, प्रशांत कदम, चंद्रकांत हारदे, रवींद्र औटी, गीताराम वाबळे, शरद किनकर, रवींद्र झावरे, संजय गागरे आणि १५० हून अधिक शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शिवाजी झावरे यांनी केले तर आभार डॉ. सुनील अडांगळे यांनी मानले.

आमच्या गावात प्रथमच कुलगुरू आले. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी व सुट्टीच्या दिवशी ते शेतकऱ्यांसाठी काम करत असल्याने शेतकरी भारावून गेले.यावेळी शेतकऱ्यांनी कुलगुरूंचा वाढदिवस साजरा केला.
