अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान,पंचनामे तातडीने करावे:- विवेकभैय्या कोल्हे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव मतदारसंघात २५ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.ऐन सणासुदीच्या तोंडावर हाताशी आलेली पिके पाण्याखाली गेली आहेत.अनेक भागातील सोयाबीन,कांदा,कांदा रोपे,मका,कपाशी या सारख्या पिकांचे नुकसान होण्याची परीस्थिती ओढवली आहे.काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.तातडीने प्रशासनाने पावले उचलून पंचनामे करावे अशी मागणी सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केली आहे.
पंचनामे,पीकविमा आणि इतर किचकट प्रक्रिया या शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी नंतर अडचणीच्या ठरतात. त्यामुळे पंचनामे वेळीच झाले तरच नुकसान झालेली तीव्रता मांडली जाते.मागील अतिवृष्टीच्या काळात अनेक शेतकरी अद्यापही नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित आहेत.त्यातच हे पुन्हा दुहेरी संकट आल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी तीव्रता आणि उद्भवलेली परिस्थितीची पाहणी करून त्यावर तातडीने कार्यवाही करावी.सरकारी पथकाने नुकसानीचा अहवाल पाठवत शासनाला तात्काळ वस्तुस्थिती निदर्शनास आणून द्यावी.या पूर्वीचा अनुभव कटू असल्याने शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीच्या तुलनेत भरपाई मिळाली नाही यावर देखील लक्ष देवून पंचनामे करताना काळजीपूर्वक करावे अशी मागणी विवेकभैय्या कोल्हे यांनी केली आहे.
आम्ही देखील अतिवृष्टीच्या मदतीचे परिमान लावताना शासनाला तीव्रता निदर्शनास आणून देणार आहोत. सर्वत्र नुकसान अधिक असल्याने सरसकट पंचनामे करून घेण्याची गरज आहे.या संकट काळात तातडीने मागील प्रलंबित पीकविमा रक्कम शेतकऱ्यांना प्राप्त झालेली नाही त्यावरही कार्यवाही व्हावी. अतिवृष्टी आणि नुकसानीची भरपाई मिळाल्यास येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना दिलासा देणे शक्य होईल असे मत देखील विवेकभैय्या कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *