
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- पुणतांबा गावाला जोडणाऱ्या पुणतांबा-नपावाडी या साडे पाच किलोमीटर रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाल्यामुळे नपावाडीचा पुणतांबा गावाशी संपर्क तुटला होता. त्यामुळे पुणतांबा गावच्या बाजारपेठेवर देखील मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी पुणतांबा-नपावाडीच्या ग्रामस्थांची तसेच संभाजीनगर ते वाकडी या रस्त्याची देखील दुरुस्ती व्हावी अशी वाकडी, संभाजीनगर मधील ग्रामस्थांची मागणी होती. नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून या रस्त्याला निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून पुणतांबा-नपावाडी व संभाजीनगर ते वाकडी या दोन्ही रस्त्यांसाठी ९.६३ कोटी निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
मागील पाच वर्षात कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या राहाता तालुक्यातील ११ गावांच्या रस्त्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली होती. या अकरा गावातील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होवून नागरिकांना रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच कळत नव्हते. त्यामुळे अपघाताला निमंत्रण देणाऱ्या या रस्त्याने जाण्याचे नागरिक टाळत होते. परिणामी मोठी बाजारपेठ असलेल्या पुणतांबा गावाच्या बाजारपेठेची आर्थिक उलाढाल मंदावली होती. विकासाच्या बाबतीत नेहमीच कोपरगाव तालुक्याप्रमाणे मतदार संघातील राहाता तालुक्यातील ११ गावांना देखील समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून साडे तीन वर्षात या अकरा गावातील अनेक रस्त्यांना कोट्यावधीचा निधी दिला आहे.
त्यामुळे पुणतांबा-नपावाडी ग्रामस्थांची मागणी पूर्ण करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून पुणतांबा-नपावाडी या साडे पाच किलोमीटर रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक टप्पा २ योजना (सर्वसाधारण) (डीपीसी) अंतर्गत ५.२० कोटी व संभाजीनगर ते वाकडी या रस्त्यासाठी ४.४३ कोटी असा एकूण ९.६३ कोटीच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होवून या रस्त्याच्या कामाला प्रारंभ होणार आहे. पुणतांबा-नपावाडी या साडे पाच किलोमीटर रस्त्याचे काम मार्गी लागल्यामुळे पुणतांबा गावाशी पुन्हा नागरिकांचा संपर्क वाढणार असून निश्चितच पुणतांबा गावची बाजारपेठ पुन्हा फुलणार आहे. त्यामुळे पुणतांबा-नपावाडी, रामपूरवाडी व परिसरातील ग्रामस्थांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.
चौकट :- पुणतांबा गावाचाच एक भाग असलेल्या नपावाडी,रामपूरवाडीच्या हजारो ग्रामस्थांचे दैनंदिन व्यवहार मागील अनेक दशकापासून पुणतांबा गावाशी होते. मात्र पुणतांबा-नपावाडी या साडे पाच किलोमीटर रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाल्यामुळे नपावाडी,रामपूरवाडीच्या ग्रामस्थांचा पुणतांबा गावाशी संपर्क तुटला होता. नपावाडी सरपंच सौ.पल्लवी ईल्हे, सदस्य सौ.वैशाली धनवटे,धनंजय उगले, मयूर वहाडणे तसेच पुणतांबा-नपावाडी, रामपूरवाडी व परिसरातील ग्रामस्थांनी या रस्त्याबाबत आ.आशुतोष काळे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या होत्या.त्याची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी या रस्त्याचा प्रश्न सोडविला आहे. त्यामुळे नपावाडी,रामपूरवाडीच्या ग्रामस्थांचा पुणतांबा गावाशी तुटलेला संपर्क आ. आशुतोष काळेंमुळे पुन्हा जोडला जावून पुणतांबा गावची बाजारपेठ पुन्हा एकदा गजबजणार आहे.
-राजेंद्र धनवटे (माजी सरपंच नपावाडी)
