राज्याच्या विकासाला वाहुन घेतलेले कर्मवीर शंकररावजी काळे कर्तृत्व आणि नेतृत्वगुणांचा संगम…
पंचायत समिती प्रांगणात कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या पुतळ्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- आम्ही कितीही गप्पा केल्या तरी मतदारसंघ सोडून निवडणूक लढवून विजय मिळवणे सोपे नाही. परंतु ते काम दुसऱ्या मतदारसंघात जाऊन कर्मवीर शंकररावजी काळेंनी निवडून येवून दाखवले. राज्याच्या विकासाला वाहुन घेतलेले कर्मवीर शंकररावजी काळे कर्तृत्व आणि नेतृत्वगुणांचा संगम असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी केले.
कोपरगाव पंचायत समिती कार्यालयात उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व नुतन पोलिस स्टेशन इमारत,बस स्थानक,पंचायत समिती कार्यालय आदी विकासकामांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते तसेच गृहमंत्री ना.दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे होते. याप्रसंगी यावेळी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे, जिल्हा परिषद अध्यक्षा ना.सौ. राजश्रीताई घुले, खासदार सुजय विखे, आ. सुधीर तांबे साहेब, आ. किशोर दराडे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, दादाभाऊ कळमकर, भानुदास मुरकुटे, पांडुरंग अभंग, भाऊसाहेब चिकटगावकर, चंद्रशेखर कदम, जयंत जाधव, रयत शिक्षण संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्या सौ. मीनाताई जगधने, संगमनेरच्या नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त कु. अनुराधा आदिक, अनिलराव शिंदे, सौ. स्नेहलताताई शिंदे, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे, डॉ. मेघना देशमुख, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे उपस्थित होत्या.
पुढे बोलतांना ना. पवार म्हणाले की, स्वत:चा परिसर सोडून पारनेरला जायच व दोनदा निवडून यायचे हे कसब कर्मवीर शंकररावजी काळेंकडे होते. त्यांचे कर्तृत्व मोठे होते लोकांना ते हवेहवेसे वाटत. त्यांनी कर्मवीर भाउरावांचा विचाराचा वारसा जपला नव्हे तर पुढे यशस्वीपणे राबविला. राज्यभर सर्वदूर रयतच्या शाखा निर्माण करून मी स्वतंत्र शैक्षणिक संस्था काढणार नाही हा कर्मवीरांना दिलेला शब्द कर्मवीर शंकररावजी काळे यांनी पाळला. आज असणारी कॕबिनेटची बैठक पुढे ढकलुन यावं लागलं. आम्ही साधु-संत नाही. २०१९ ला आशुतोषला मताधिक्य कमी मिळाले यावेळी आशुतोषला मताधिक्य वाढले पाहिजे. मी शब्दाला पक्का आहे. आशुतोष ने सांगितलेली कामे केली नाही तर पवाराची औलाद नाही. आशुतोष कोपरगावचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी सरकार आशुतोषच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. तसेच ना. आशुतोष काळे यांच्या मागणीनुसार ग्रामिण पोलीस स्टेशन साठी चार कोटी निधी देण्याचे जाहीर करून पोलीस वसाहतीची साठी २१ कोटी असे पंचवीस कोटी देणार असल्याचे जाहीर केले.तसेच संगमनेर बसस्थानकाच्या धर्तीवर बीओटी तत्वावर कोपरगाव बसस्थानकालगत व्यापारी संकुले सुरु करण्यास मंजूरी देणार असल्याची ग्वाही दिली. आशुतोषने मतदार संघासाठी आजपर्यंत भरघोस निधी आणला आहे. यापुढेही निधी कमी पडू देणार नाही. कोपरगाव शहर व ग्रामीण भागाच्या विकासाचा आराखडा तयार करून पाठवा त्यास तातडीने मान्यता दिली जाईल असा शब्द देवून आशुतोषला तुम्ही निवडून दिले आता कामे पूर्ण करण्याची जबाबदारी आमची अशा शब्दात त्यांनी भविष्यात कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी निधीचा ओघ सुरूच राहील असे सूचित केले.
प्रास्तविक करतांना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे म्हणाले की, कर्मवीर शंकररावजी काळे यांनी जिल्हा परिषदेचे सलग दहा वर्ष अध्यक्ष असतांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, जलसंधारण, कृषी, महिला बालकल्याण तसेंच सहकार व सामाजिक कार्यात केलेल्या कार्याची प्रेरणा भावी पिढीला मिळावी या जनभावनेचा आदर करून कर्मवीर शंकररावजी काळे मित्र मंडळाच्या वतीने पंचायत समितीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या पुतळ्याचे अनावरण व उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची प्रथमच कोपरगाव शहरात होत असलेली जाहीर सभा हा दुग्धशर्करा योग आहे.
२०१९ ला मतदार संघातील जनतेने विश्वास दाखवून निवडून दिले तो विश्वास सार्थ ठरवून अडीच वर्षात मतदार संघाच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकारकडून एक हजार कोटी निधी आणला. कोपरगावचा पाणी प्रश्न गंभीर झाला होता.हा प्रश्न कायम स्वरूपी सोडवण्यासाठी १३१.२४ कोटी निधी पाच नंबर तलाव व वितरण व्यवस्थेसाठी दिल्याबद्दल शहरातील जनतेच्या वतीने उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात कोपरगाव शहर व ग्रामीण असे दोन स्वतंत्र पोलीस स्टेशन निर्माण करण्यात आले असून शहर पोलीस स्टेशन इमारतीचे काम झाले असले तरी ग्रामीण पोलीस स्टेशन व पोलीस कर्मचारी वसाहतीसाठी निधी द्यावी अशी मागणी केली. कोपरगाव बसस्थानक इमारतीच्या उभारणी मध्ये नियोजनाचा आभाव होता संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आलेल्या बसस्थानकाप्रमाणे चहूबाजूने व्यापारी संकुल व मध्यभागी बस स्थानक या आदर्श बस स्थानकाप्रमाणे कोपरगाव बस स्थानकाच्या चहूबाजूने व्यापारी संकुल उभारण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवले आहे त्यास मंजुरी द्यावी अशी मागणी केली. मतदार संघातील रस्त्यांसाठी १६५ कोटी निधी आणला असून गावागावात रस्त्याचे काम सुरु आहे.काकडी विमानतळासाठी १५० कोटी निधीची अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली असून त्यामुळे देश विदेशातून येणाऱ्या साई भक्तांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.शेती सिंचनाचा प्रश्न महत्वाचा असून गोदावरी कालव्यांना १०० वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे कोपरगाव शहरात अनेक ठिकाणी असलेल्या शासकीय जमिनीवर व्यापारी संकुल होणे गरजेचे आहे त्याचबरोबर भूमिगत गटारी, एकात्मिक रस्ते विकास, आवास योजने अंतर्गत नागरिकांना घरे, तीर्थक्षेत्र विकास असे शहरातील ५०० कोटीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले असून त्यांना मंजुरी द्यावी अशी मागणी ना. आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री ना. अजित पवारांकडे केली
यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस उपायुक्त बी.जी. चंद्रशेखर पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. मनोज पाटील, श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, अविनाश दंडवते, सुहास आहेर, सुरेश वाबळे, महेंद्र शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण, उपाध्यक्ष नारायणराव मांजरे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, आजी-माजी संचालक, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, युवक कॉंग्रेसचे उपजिल्हा प्रमुख तुषार पोटे, जिल्हा परिषद पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य, आजी-नगरसेवक, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट :- लहानपणापासून आजोबा कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्याकडून शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कार्याची माहिती मिळत होती. आज त्यांच्या सोबत काम करतांना मी त्यांच्याकडे माझे आजोबा म्हणून पाहतो तर माझे वडील माजी आमदार अशोकराव काळे आणि नामदार अजितदादा पवार यांचा स्वभाव सारखाच असून स्पष्टवक्तेपणा व एक घाव दोन तुकडे अशी कामाची पद्धत असून ना. अजितदादांमध्ये माझ्या वडीलांना पाहतो.- ना. आशुतोष काळे.
चौकट :- कालव्यांचे नूतनीकरण करण्यासाठी ३०० कोटी रु.जलसंपदा विभागाने देण्याचे मान्य केले असून दरवर्षी १०० कोटी मिळणार आहे.३६ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे ५५ कोटीच्या कामाची निविदा लवकरच प्रसिद्ध होणार आहे. कालव्याच्या नूतनीकरण बरोबर धरणाच्या वरच्या भागात गोदावरी कालव्याच्या लाभ क्षेत्राला नवीन पाणी कसे उपलब्ध करून देता येईल यासाठी प्रयत्न व्हावे अशी मागणी केली. दुष्काळ पडल्यावर धरणातील आमच्या वाट्याच पाणी खाली सोडण्यात येत आहे समन्यायी पाणी वाटप कायद्यातून गोदावरी कालव्याच्या लाभ क्षेत्राला दिलासा देण्यासाठी जलसंपदा मंत्र्यांच्या कानावर घातले आहे. त्यामध्ये आपण जातीने लक्ष घालावे.निळवंडे कालव्याच्या रखडलेल्या कामाला गती देऊन भरीव निधीची तरतूद केली असून हि कामे तातडीने पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करावे.- ना. आशुतोष काळे.

फोटो ओळ:- कोपरगाव पंचायत समिती कार्यालयात उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण प्रसंगी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, गृहमंत्री ना.दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ, मा.आ. अशोकराव काळे, ना. आशुतोष काळे व मान्यवर

फोटो ओळ:- कोपरगाव पंचायत समिती कार्यालयात उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण प्रसंगी जाहीर सभेत बोलतांना उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार.
