के.जे. सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा १८ फेब्रुवारी रोजी आयोजित…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
“स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा शुक्रवार दि. १८/०२/२०२२ रोजी स. १०:०० वा. महाविद्यालयाच्या साकरबेन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.” अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव व पालक- शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. मधुकर काशिनाथ साबळॆ यांनी येथे दिली. या प्रसंगी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. सुनील बोऱ्हाडे, बाबासाहेब कर्डीले, सचिव प्रा. डॉ. गणेश देशमुख व सदस्य श्रीमती अनिता औताडे , विजय बारहाते, गोकुळ नेहे, गीता निकुंभ, सुभाष सोनवणे, महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. विजय ठाणगे इ. मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी पालक शिक्षक मेळाव्याचे अध्यक्ष श्री. मधुकर साबळे सविस्तर माहिती देताना पुढे म्हणाले की, “मागील वर्षी कोविड -१९ च्या परिस्थितीमुळे पालक मेळावा १ एप्रिल २०२१ रोजी ऑनलाईन पद्धतीने झाला होता. त्यामुळे अनेक पालकांना वेळेअभावी व इतर कारणांनी सहभाग नोंदविता आला नव्हता. या वर्षी हा पालक मेळावा प्रत्यक्ष (ऑफलाईन) घेतला जाणार आहे . त्यामुळे अधिकाधिक पालकांनी या मेळाव्यास उपस्थित राहून आपल्या पाल्याला येणाऱ्या अडचणी व त्यांचे भवितव्य याविषयी प्राचार्य व प्राध्यापक, संस्थाचालक यांच्या समोर मांडावे, त्यामुळे त्यातून सार्थक अशा बाबी घडून येतील.”
प्राचार्य डॉ. बी. एस. यादव या प्रसंगी म्हणाले की, “के. जे. सोमैया महाविद्यालय हे कोपरगाव तालुक्यातील उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणारे पहिले महाविद्यालय आहे. महाविद्यालयाने मागील दोन दशकात विद्यार्थ्यांना उच्च व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून अनेक सुविधा व अभ्यासक्रम सुरु केले आहेत. या सर्व बाबी पालकांनी बघाव्यात व आपल्या पाल्याला अध्ययनात काही अडचणी येत असल्यास त्या आमच्या समोर मांडाव्यात. त्यामुळे त्यातून काही मार्ग काढून आपल्या सर्वांच्या सहकार्याने त्या दूर करण्यात येतील.”
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे म्हणाले की, “NAAC या राष्ट्रीय संस्थेने आमच्या संस्थेच्या के. जे. सोमैया महाविद्यालयाला दोन वेळा ‘अ ‘ श्रेणी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उत्कृष्ठ महाविद्यालय व इतर संस्थांनीही विविध पुरस्कार देऊन गौरविले आहे. अशा शैक्षणिक संस्थेत आपला पाल्य शिक्षण घेत आहे. ही आम्हालाही गौरवास्पद बाब वाटते. मात्र त्याला अधिकाधिक सोइ- सुविधा पुरवून रोजगारसन्मुख शिक्षण द्यावे, असा आमचा प्रयत्न आहे. मात्र त्यामध्ये त्याला काही अडचणी येत असतील तर पालकांद्वारे त्यांनी त्या आमच्यापर्यंत पोचवाव्यात, म्हणजे त्यातून योग्य मार्ग काढून त्यावर मात करता येईल, हेच या पालक मेळाव्याचे प्रमुख प्रयोजन आहे.
तरी या पालक मेळाव्यास बहुसंख्य पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे सचिव ऍड. संजीव कुलकर्णी व विश्वस्थ श्री. संदीपराव रोहमारे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *