Uncategorized

देर्डे-कोऱ्हाळे येथे एसटी बस थांब्यास मंजुरी; स्नेहलता कोल्हेंकडून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार…

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील देर्डे-कोऱ्हाळे येथे एसटी बस थांब्यास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून अधिकृत मंजुरी मिळाल्याची माहिती मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.कोपरगाव तालुक्यातून प्रवासी शिक्षण, नोकरी, वैद्यकीय उपचार तसेच विविध कामांसाठी मुंबई, पुणे, नाशिक, शिर्डी व अहिल्यानगर येथे जात असतात. मात्र देर्डे-कोऱ्हाळे येथे एसटी बस थांबा नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
विशेषतः विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत असल्याने मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदन सादर करून सर्व बससेवांना देर्डे-कोऱ्हाळे येथे सक्तीने थांबा देण्याची मागणी केली होती.देर्डे-कोऱ्हाळे परिसरातील नागरिक, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांची प्रवासाची गैरसोय दूर व्हावी यासाठी मा. आ.स्नेहलताताई कोल्हे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या मागणीची दखल घेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने देर्डे-कोऱ्हाळे येथे बससेवांना सक्तीने थांबा देण्याबाबत अधिकृत आदेश जारी केले आहेत.
राज्य परिवहन महामंडळाच्या अहिल्यानगर विभागाने कोपरगाव-नाशिक मार्गावरील बससेवा देर्डे-कोऱ्हाळे येथे थांबवून प्रवासी व विद्यार्थ्यांना चढ-उतार करण्याबाबत संबंधित चालक व वाहकांना सूचना दिल्या असून यासंदर्भातील अधिकृत पत्रही जारी करण्यात आले आहे.याबद्दल मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी व प्रशासनाचे आभार व्यक्त केले. या निर्णयामुळे देर्डे-कोऱ्हाळे व परिसरातील नागरिकांची मोठी सोय होणार असून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोपरगाव तालुक्यातील देर्डे-कोऱ्हाळे येथील नागरिक, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांची प्रवासाची गैरसोय दूर व्हावी, ही या मागणीमागील प्रमुख भावना होती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या मागणीची सकारात्मक दखल घेऊन तत्काळ कार्यवाही केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि वेळेवर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे – स्नेहलताताई कोल्हे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *