सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीव शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठीकोपरगांवकरांच्या वतीने भव्य तिरंगा महारॅली संपन्न….

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर – पहलगाम येथे झालेल्या हल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानवर ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम राबविण्यात आली. या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीमेत शौर्याचे दर्शन घडवून पाकिस्तानला वठणीवर आणणाऱ्या शूर भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ व या मोहिमेत शहीद झालेल्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कोपरगाव शहरात कोपरगावकरांच्या वतीने तिरंगा महारॅली काढण्यात आली.यावेळी आ.आशुतोष काळे यांनी या महारॅलीमध्ये सहभागी होत देशाचा नागरिक या नात्याने सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी भारत माता की जय,वंदे मातरम् च्या घोषणांनी कोपरगाव शहर दणाणून गेले होते.


पहलगाम येथे पर्यटकांवर करण्यात आलेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात २६ निरपराध पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता.त्याचा बदला आपल्या भारत देशाने ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम राबवून घेतला असून भारताच्या शुर सैनिकांनी केलेल्या बलाढ्य पराक्रमाने पाकिस्तानला आपल्यापुढे गुडघे टेकावे लागले. परंतु या लढाईत आपल्या देखील काही सैनिकांना वीरमरण आले आहे. त्यामुळे शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व वीर जवांनाना संपूर्ण भारत देश तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास देवून सर्व सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी समस्त कोपरगावकरांच्या वतीने बुधवार (दि.१४) रोजी सायंकाळी ५.०० वाजता तिरंगा महारॅली आयोजित करण्यात आली.यावेळी आ.आशुतोष काळे यांनी देखील या महारॅलीत सहभागी होवून देशाचा नागरिक या नात्याने आपले कर्तव्य बजावले.
कोपरगाव शहरासह तालुक्यातील नागरिकांनी या तिरंगा महारॅलीला भरभरुन प्रतिसाद देवून या महारॅलीमध्ये सहभागी होवून देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विघ्नेश्वर मंदीरापासून सुरु झालेली ही महारॅली छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, महात्मा गांधी स्मारक, श्रीराम मंदिर रोड, छत्रपती संभाजी महाराज स्मारक व त्यानंतर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी येवून सामूहिक राष्ट्रगीताने या महारॅलीची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *