
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर – पावसाळा सुरू होवून तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असून अजूनही कोपरगाव मतदार संघात अपेक्षित पाऊस पडलेला नाही.त्यामुळे मतदार संघावर असलेले दुष्काळाचे सावट दूर व्हावे. मतदार संघात भरपूर पाऊस पडुन बळीराजा सुखी व्हावा यासाठी आ.आशुतोष काळे गुरुवार (दि.०७) रोजी आपल्या माहेगाव देशमुख गावचे ग्रामदैवत श्री दत्तात्रय चरणी प्रार्थना करणार आहे.
पर्जन्य छायेखाली असलेल्या कोपरगाव मतदार संघावर वरून राजाने यावर्षी जास्तच खपामर्जी केल्यामुळे संपूर्ण मतदार संघावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. खरीपाची पिके पूर्णपणे जळून गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता तर वाढल्याच आहेत. परंतु हीच परिस्थिती पावसाळा संपेपर्यंत अशीच राहिली तर रब्बी हंगामाचे भवितव्य देखील धोक्यात येणार आहे. यापुढे देखील अशीच परिस्थिती राहिली तर पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. अशी भीषण परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा सर्वच घटकांवर विपरीत परिणाम होणार आहे. त्यासाठी कोपरगाव मतदार संघासह राज्यात ज्या ठिकाणी कोपरगाव मतदार संघाप्रमाने दुष्काळजन्य परिस्थिती आहे त्या त्या ठिकाणी पर्जन्यवृष्टी होवून बळीराजा सुखी व्हावा यासाठी माहेगाव देशमुख येथे समस्त ग्रामस्थांसमवेत ग्रामदैवत श्री द्दत महाराजांच्या चरणी प्रार्थना करणार आहे.
पावसाळा संपण्यासाठी काही दिवसांचाच अवधी शिल्लक आहे या दिवसात जास्तीत जास्त पर्जन्यमान होवून बळीराजा सुखी व्हावा यासाठी मतदार संघातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी आपापल्या गावातील धार्मिक स्थळी ग्रामदैवताची पाऊस पडावा यासाठी प्रार्थना करावी असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
